ट्रकचालकाचा मुलगा निघाला लंडनला

बल्लारपूरच्या ध्येयवेड्या जयची सातासमुद्रापार शिक्षणभरारी
वडील ट्रक चालक, ट्रकची स्टेअरिंग हातात घेताघेता त्याच्या हातात पुस्तके पडली. बाबासाहेबांच्या विचारांची सोबत केली. दलित वस्तीतली पोरं शिकावी, यासाठी मोफत शिकवणी वर्ग घेतले. ध्येयाने पछाडलेल्या तरुणाने ध्येय फाऊंडेशन सुरू केले. आता त्याच्या सामाजिक कर्तुत्वाचा आलेख लंडनच्या जागतिक विद्यापीठापर्यंत पोहोचला आहे.
जय भारत चौधरी (२४) या तरुणाची शिक्षणभरारी प्रेरणादायी आहे. आहे. ट्रक चालकाचा मुलगा आता लंडनला उच्चशिक्षणासाठी निघाला आहे. बल्लारपूर शहरातील बुद्धनगर दलित वस्तीत लहानाचा मोठा झालेल्या जय या तरुणाची इंग्लंड येथील जगातील नामांकित एडिनबर्ग विद्यापीठ स्कॉटलंड येथे ‘सामाजिक ‘शिक्षण तसेच डेटा असमानता आणि समाज’ या विषयाच्या उच्चशिक्षणासाठी निवड झाली आहे. या विद्यापीठाचा जागतिक पहिल्या १५ विद्यापीठात समावेश आहे. त्यासाठी जयला महाराष्ट्र शासनाची राजर्षी शाहू महाराज परदेशी उच्चशिक्षण शिष्यवृत्तीही मिळाली
जयचे दहावीपर्यंतचे शिक्षण बल्लारपुरातील सर्वोदय विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. बारावी हैदराबाद येथून पूर्ण केले, तर संगणक विज्ञानाची पदवी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे पूर्ण केली. मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने सुरुवातीला जयला
बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने व शिक्षणासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने आई-वडिलांनी ‘ओव्हरटाईम’ कामे करायला सुरुवात केली. ही परिस्थिती बदलली पाहिजे, हा दृढ निश्चय करून जयने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. आता थेट लंडनच्या जागतिक विद्यापीठात जयने प्रवेश निश्चित केल्याने कुटुंबीय आनंदी झाले आहे. ध्येय फाउंडेशनद्वारे २५० हून अधिक युवकांना त्याने विहारात शिक्षणाचे धडे दिले.
वंचित बहुजन घटकातील मुलांना शिक्षणाची दिशा मिळावी, यासाठी त्याने वार्डातीलच पंचशील बुद्ध विहारात पंचशील अॅकॅडमी सुरू केली. याद्वारे आतापर्यंत २५० हून अधिक मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करून त्यांना उच्च शिक्षणाचे धडे दिले. मोफत इंग्रजीचे वर्ग घेतले. यातील बरेच विद्यार्थी आता मोठ्या कंपनीत कार्यरत असल्याचे जय अभिमानाने सांगतो. याच बुद्ध विहारात मोठे वाचनालय फाउंडेशनद्वारे सुरू केले असून बाबासाहेबांची दुर्मिळ पुस्तकेही मोठ्या प्रमाणात विहारात उपलब्ध आहेत.
शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठीच
प्रतिकूल परिस्थितीवर आपण शिक्षणानेच मात करू शकतो. बाबासाहेबांची पुस्तके वाचल्यानंतर याची प्रकर्षाने जाणीव झाली. माझं कुटुंब, माझ्या आजूबाजूचा समाज अजूनही शिक्षणापासून वंचित आहे. जगातील नामांकित विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर माझ्या शिक्षणाचा उपयोग तळागाळातील वंचित-बहुजन समाजाच्या हितासाठीच करणार आहे. मनात जिद्द असली तर कुठलीच गोष्ट कठीण नाही. पुढील काळात चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सहकार्य करणार असल्याचेही जयने सांगितले.