*२७ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन; बालपणीच्या आठवणींना उजाळा*
चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील विश्वशांती विद्यालय सावली सन १९९८–९९ या शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी दिनांक १५ मार्चला तब्बल २७ वर्षांनंतर चंद्रपूर येथे एकत्र येत स्नेहमिलन व गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले. या पुनर्मिलन (reunion) सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी शालेय जीवनातील क्षण पुन्हा अनुभवले.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले विद्यार्थी आज देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये व राज्यांमध्ये स्थायिक झाले आहेत. तरीही मैत्रीचे बंध जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येत हा सामाजिक मेळावा आयोजित केला. कार्यक्रमात उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गातील खोडकर प्रसंग तसेच त्या काळातील आनंददायी क्षण आठवत भावनिक वातावरण निर्माण झाले.

या स्नेह मिलन कार्यक्रमासाठी वारंगल, हैदराबाद, नागपूर , पुणे,चंद्रपूर तसेच इतर अनेक शहरांमधून माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित झाले होते. अनेक वर्षांनंतर एकमेकांची भेट झाल्यामुळे सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची ओळख करून देत आयुष्यातील वाटचाल, यश-अपयशाचे अनुभव आणि साध्य केलेल्या ध्येयांविषयी माहिती शेअर केली.

या स्नेह मिलनाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ झाले. भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करून एकमेकांशी संपर्क कायम ठेवण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचा शेवट समूह छायाचित्र आणि आठवणींनी भारलेल्या संवादाने झाला.




