सावलीत संमिश्र आक्रोश मोर्चा
*’नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा निषेध; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी तहसीलदारांना निवेदन*
सावली :’नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेली कथित तडजोड आणि केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात सावली येथे गुरुवारी (दि. २३ जुलै) संमिश्र आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दिल्लीतील समाजसेवक सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत जुन्या नगर पंचायतसमोरील पटांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात घोषणाबाजी करत ‘नीट’ परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यात आला.
मोर्चाच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, ‘नीट’ परीक्षेतील कथित गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य संकटात आले असून, या प्रकरणात केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या कथित खेळाविरोधात सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार संमिश्र आक्रोश मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात उषाताई भोयर, चंदा गेडाम, लता लाकडे, साधना वाढई, अंजली दमके, भारती चौधरी, राधा ताटकोंडावार, उल्का खिब्रागडे, उल्का गेडाम, नितीन गोहणे, कृष्णा राऊत, विजय न्यूतलवार, प्रवीण सुरमवार, किशोर कारडे, प्रफुल वाळके, अतुल येल्टीवार, विजय गड्डमवार, विजय कोरेवार, मुकद्दर मेश्राम, विलास यासलवार, आकाश खिब्रागडे, प्रितम गेडाम, नितेश रस्से, दिलीप लटारे, गिरजाशंकर दुधे, अंकुश शेंडे, गुणवंत दुधे यांच्यासह तालुक्यातील शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.
मोर्चानंतर प्रतिनिधी मंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.



