*शवविच्छेदन गृहाची पर्यायी व्यवस्था निर्माण करा*…..
“सिडिसिसी संचालक रोहित बोम्मावार यांची मागणी “‘मुख्यालयात शवविच्छेदन गृहाचा अभाव”
*सावली* उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरू असलेल्या १०० खाटांच्या नवीन इमारत बांधकामादरम्यान शवविच्छेदन गृहाची तोडफोड करण्यात आल्याने सावली तालुक्यात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे मृत व्यक्तींच्या शवविच्छेदनासाठी आता २० ते ४० किलोमीटर अंतरावरील मूल, सिदेवाही, गडचिरोली आदी तालुक्यांमध्ये मृतदेह नेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. या परिस्थितीमुळे दुःखी कुटुंबियांना नाहक मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त करत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित बोम्मावार यांनी तातडीने पर्यायी शवविच्छेदन व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली आहे.
सावली शहरात उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे , कंत्राटदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता जुने शवविच्छेदन गृह पाडल्याने अचानक मोठी अडचण निर्माण झाली.त्यामुळे १११ गाव आणि सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या सावली तालुक्याच्या मुख्यालयात आज शवविच्छेदन गृहच उपलब्ध नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामीण रुग्णालय १९९९ मध्ये सुरू झाले असले तरी आजही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता कायम आहे. त्यातच शवविच्छेदन गृह नसल्याने अपघात, आत्महत्या किंवा संशयास्पद मृत्यूच्या घटनांमध्ये मृतदेह तासन्तास बाहेर ठेवावे लागत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, स्मशानभूमीलगत आमदार निधीतून उभारण्यात आलेले दुसरे शवविच्छेदन गृह आज बेवारस अवस्थेत असून त्याचा उपयोग होत नसल्याचेही बोम्मावार यांनी निदर्शनास आणून दिले. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पर्यायी शवविच्छेदन केंद्र सुरू करावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या संवेदनांशी संबंधित हा विषय असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी.अशी मागणी करण्यात येत आहे..



