विहार हे समाज परिवर्तन आणि विचार जागृतीचे केंद्र आहे- रोहित बोम्मावार
“दाबगाव मौशी येथे संबोधी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा “ *सावली* तालुक्यातील दाबगाव मौशी येथे संबोधी बुद्ध विहार लोकार्पण व भगवान बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिडीसिसी संचालक रोहित बोम्मावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
अध्यक्षीय भाषणात रोहित बोम्मावार यानी “भगवान गौतम बुद्धांनी मानवजातीला दिलेला धम्म हा केवळ धर्म नसून तो जीवन जगण्याची शास्त्रीय आणि व्यावहारिक पद्धत आहे. त्यांनी अहिंसा, समता, करुणा आणि प्रज्ञा या तत्वांवर आधारित समाज निर्माण करण्याचा संदेश दिला. बुद्ध विहार हे त्या धम्माचे केंद्र असून ते केवळ पूजा-अर्चेपुरते मर्यादित नसून शिक्षण, प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे.” त्यामुळेच विहार हे केवळ प्रार्थनेचे ठिकान नसून ते समाज परिवर्तन आणि विचार जागृतीचे केंद्र आहे .
ते पुढे म्हणाले की, बुद्धांनी सांगितलेला ‘अतः दीप भव’ हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणला, तर व्यक्ती आणि समाज दोन्ही प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकतात.
सदर कार्यक्रम संबोधी बुद्ध विहार विकास मंडळ, दाबगाव मौशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी दिनेश चिटनुवार, सभापती राजू ठाकरे, गोपाल रायपुरे, ईश्वर गंडाटे, प्रकाश वरगंटीवार, भोगेश्वर मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून बुद्ध विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात एकता व बंधुभाव टिकवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघरत्न निमगडे व अमित वाकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष यांनी मानले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अश्विनी खोब्रागडे तसेच संविधान मनोहरे व त्यांच्या संचाने बहारदार भीमगीतांचा नजराणा सादर केला,
या कार्यक्रमाला बहुसंख्य बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केला …..



