राज्यातून 390 ट्रेन्सच्या माध्यमातून जवळपास 5 लाख 20 हजार कामगारांची मूळगावी रवानगी

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास 5 लाख 20 हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली आहे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. 22 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून 325 ट्रेनच्या मदतीने कामगार, मजूरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली. आज आणखी 65 विशेष श्रमिक ट्रेन जाणार आहेत. अशा जवळपास 390 विशेष ट्रेनद्वारे 5 लाख 20 हजार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे.
तिकीट खर्च राज्य शासन उचलणा
परप्रांतीय कामगार बंधू-भगिनींना विनंती करण्यात येत आहे की, त्यांचे नाव यादीत असेल आणि त्यांना फोन आला असेल तरच त्यांनी संबंधित ट्रेनसाठी रेल्वे स्टेशनला यावे. रेल्वे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नये. त्यांच्या तिकीटाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र राज्य शासनाने केलेला आहे. त्यांना तिकीट काढण्याची गरज नाही याची नोंद घ्यावी असं आवाहन अनिल देशमुख यांनी केले आहे.
मुंबई शहरामध्ये विशेषतः परप्रांतीय मजूर, कामगार यांची संख्या जास्त आहे. त्या सर्वांची नोंद पोलिसांना घ्यावी लागत आहे. तसेच जाणाऱ्या कामगारांना व्यवस्थित पाठवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील अनुभवी जवळपास 1500 अधिकारी व कर्मचारी आजपासून देण्यात आलेले आहे.
390 विशेष श्रमिक ट्रेन
राज्याच्या विविध भागातून 1 मे पासून 20 मे पर्यंत राज्यातील विविध स्टेशन वरून 390 विशेष श्रमिक ट्रेनद्वारे या सर्वांना पाठवण्यात आले. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश 207, राजस्थान 15, बिहार 51, कर्नाटक 9, मध्यप्रदेश 34, जम्मू 3,ओरिसा 11, पश्चिम बंगाल 3, झारखंड 18, यासह इतर राज्यांचा समावेश आहे.
भिवंडी 7, डहाणू 1,कल्याण 2, पनवेल 21, ठाणे 9, लोकमान्य टिळक टर्मिनस 45 ,सीएसएमटी 51, वसई रोड 9, पालघर 4, बोरिवली 25, बांद्रा टर्मिनस 22 ,अमरावती 4, अहमदनगर 6, मिरज 5, सातारा 7, पुणे 32, कोल्हापूर 17, नाशिक रोड 5, नंदुरबार 4, भुसावळ 3, साईनगर शिर्डी 4, जालना 2, नागपूर 9,औरंगाबाद 9 , रत्नागिरी 3 यासह इतर रेल्वे स्टेशन वरून श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.