वाहः रे !!! दिवाळीतील महागाई……

वणी – कोरोना काळात गेल्या सात महिन्यापासून घरात असलेल्या जनतेला दिवाळीचे वेध लागले आहेत. परंतू जीवनाश्यक वस्तूंचे भाव ज्या पध्दतीने वाढत आहेत, त्याची राज्य सरकारने गंभिर दखल घेण्याची गरज आहे.कोरोना या महामारीच्या काळात जनतेने आपल्या सर्व सण, उत्सवांना फाटा दिला. गुढी पाडवा, होळी, रंगपंचमी, पोळा, दसरा या सारखे अनेक सण लोकांनी घरातच साजरे केलेत. लॉकडाउनच्या वाढत्या कालावधीमुळे जनतेत भितीचे वातावरण देखील पसरले होते. परंतू अनलॉकची प्रक्रिया जवळ पास ऐशीं टक्के क्षेत्रासाठी लागू झाल्याने आता बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. जनतेतील भितीचे वातावरण देखील कमी होतांना दिसते आहे. रूग्ण संख्येचे प्रमाण देखील दिवसागणिक कमी-कमी होते आहे. तर रूग्णांचा ‘रिकव्हरी रेट’ म्हणजे दूरूस्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
अशा वातावरणात उत्सव प्रेमी जनतेच्या मनात दिवाळी प्रेमाचे भरते आल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. परंतू जनतेच्या या आनंदोत्सवावर महागाईचे विरजण घालण्यास सुरूवात झालेली आहे. दिवाळी हा सण विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवून साजरा केला जाणारा सण आहे. फराळ, आतिषबाजी, रंगरंगोटी, कपडे, आभूषण, वाहन खरेदी, घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी दिवाळी सणानिमित्ताने होतांना दिसते. सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती असे सुवर्णालंकार खरेदी करणारा एक विशिष्ठ उत्पादन असलेला वर्ग आहे. परंतू सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, नोकरदार वर्ग किराणा, दिवाळीचा फराळ, फटाके खरेदी करून दिवाळी आनंदात साजरी करीत असतो. परंतू सामान्य माणसाला ही दिवाळी तिन पक्षाचे सरकार आनंदात साजरी करू देणार नाही अशी चिन्हे दिसू लागली आहेत. जवळपास 15 ऑक्टोबर पासून फराळासाठी लागणार्या किराणा मालाच्या किंमतीत भरमसाठ वाढ होतांना दिसते आहे.
व्यापारी वर्ग मागील सात महिन्यात कोरोना काळात झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळी सणांत काढण्याच्या मानसिकतेत दिसतो आहे. उध्दव सरकारने यावर ताबडतोबीने निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. फराळासाठी अत्यावश्यक खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. एका खाद्य तेल डब्यामागे जवळपास 220 ते 260 रूपयांपर्यंत वाढ झालेली आहे. हरभरा डाळ, मुग डाळ, बेसन पीठ, खोबरे, रवा, मैदा, सुकामेवा, शेंगदाणे, यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. शेंगदाणा, सुर्यफुल, सोयाबीन तेलाच्या किंमती आश्चर्यकारक वाढलेल्या आहेत. डाळीचे भाव 20 ते 30 रूपयांनी वाढले आहेत. परंतू यावर बोलायला कुणीही तयार नाही. परतीच्या दोन पावसांनी शेतकर्यांना उध्वस्त केले आहे. शेतमजूरांना काम उरलेले नाही. ग्रामीण भागात दिवाळी असतांना सुध्दा संकटाचे सावट पसरलेले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याची गंभिर दखल घेण्याची गरज आहे. शेतकर्यांच्या हातात दिवाळीला येणारा पैसा निसर्गाने हिरावून नेला आहे. नोकरदारांचे वेतन थकले आहे. एसटी कामगारांचे तीन महिन्याचे वेतन थकले आहे. कंपन्या बंद असल्याने लाखो तरूणांचे वेतन बंद आहे. परिस्थिती भयाण आहे. भाजीपाला, दूध, कांद्याचे भाव कडाडले आहेत. अशा परिस्थितीत पंधरा दिवसावर दिवाळी येवून पोहचली आहे. कोरोना-कोरोना ऐकून नागरिक उद्वीग्न झाले आहेत. आता दिवाळीचा सण तरी पोरांबाळासाठी आनंदात साजरा करू अशी भावना पसरलेली असतांना बाजारातील महागाईने त्यावर विरजण घालण्याचे काम केले आहे. विरोधी पक्षनेते आरोप-प्रत्यारोपात व्यस्त आहेत. कुणी राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) मध्ये 400 कोटींचा घोटाळा सांगतो आहे, तर कुणी रूग्णालयांच्या नावाखाली ठाकरे सरकारचा 12 हजार कोटीचा महाघोटाळा सांगतो आहे. दिव्यदृष्टी असलेले सामनाकार महाराष्ट्रावर बोलायला, लिहायला तयार नाहीत. त्यांना मुंगेरचा हिंसाचार दिसतो आहे. परंतू महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार दिसत नाही. राज्यातल्या महागाईवर ते बोलायला तयार नाहीत. राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राज्यकर्त्यांचा आटापिटा सुरू आहे. परंतू राज्यकर्त्यांनो घाणेरडे राजकारण महिनाभर बंद ठेवा. या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगारांची दिवाळी गोडधोड कशी साजरी होईल याची चिंता करा. सणासुदिचे दिवसात साठवणूक करून जनतेला वेठीस धरणार्या हरामखोर व्यापारी वृत्तीला आळा घाला.दिवाळीत लागणार्या अत्यावश्यक किराणा मालाच्या किंमती निश्चित करा. नफेखोर व्यापार्यांवर धाडी घाला. नकली दुधाचे पदार्थ, मिठाई यावर निर्बंध घाला. झोपलेल्या अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाला जागे करा. अन्यथा महागाई वाढत असतांना जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देवू नका. अन्यथा तुमच्या शुभेच्छांना फाट्यावर मारून तुम्हाला सत्तामुक्त करण्याच्या तयारीला जनता लागेल. जनतेची मानसिकता आणि मनस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे. तीला सावरण्याचे कार्य राज्यकर्त्यांचे असते. केवळ आरोप-प्रत्योराप करून वेळकाढूपणाचे धोरण स्विकारू नका. तर सामान्य जनतेला दिलासा देण्याचे धोरणात्मक निर्णय घ्या. कपाशी, मका खरेदी ताबडतोबीने सुरू करा. अतिवृष्टीचे दहा कोटी येत्या 15 दिवसाचे आत शेतकर्यांच्या खात्यावर कसे जमा होतील यासाठीचे आदेश करा व किमान दिवाळीत तरी सामान्य जनतेला न्याय मिळेल, अशी तरतूद करून महागाई मुक्त दिवाळी कशी साजरी होईल. यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून साठेबाजांविरूध्द कारवाई करा व खाद्य तेल, साखर, डाळींचे भाव कसे नियंत्रणात राहतील यासाठी विशेष उपाययोजना करा. एव्हढेच….