भातपिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान..
भातपिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान..
प्रशासनाने मोका चौकशी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्याची मागणी..
कवठी प्रतिनिधी,
सावली तालुक्यातील कवठी, पारडी, रुद्रापूर गावातील शेतकऱ्यांचे हातात आलेले भात पीक परतीच्या पावसामुळे पार उद्धवस्त झालेले दिसुन येत आहे. जलसिंचनाची अपुरी सोय असल्याने परीसरातील शेतकरी शेतामध्ये हलके प्रजातीचे धान पीक लावतात. त्यामुळे या शेतकऱ्यांचा बर्यापैकी धानपिक फुटला असून ते पिक कापणीसाठी सज्ज झाले असतांना परतीच्या वादळी पावसामुळे पुर्णता जमीनदोस्त झाल्याने परीसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कापणिला आलेला भातपिक जमीनिवर पडले असुन पाणी साचले असल्याने काही ठीकाणी धानाचे कोंब तयार होतांना दिसुन येत आहेत. त्यामुळे धानाची कापणी करायची कशी असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना पडला असुन वादळी पावसामुळे पुन्हा बळीराजा काकुळतिला आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, पावसामुळे शेतात उभे असलेले धान पीक करपून गेले आहे. सदर परिसरात जलसिंचनाची सोय नसल्याने परिसरातील शेतकरी हलक्या धान प्रजातिची पेरणी करतात मात्र, परतीच्या पावसाने कापणीला आलेले धानपीक पुर्णता पडलेले दिसत आहे. शेतातील हे विदारक दृष्य पाहून ज्या प्रमाणे पावसाचे थेंब पडत आहे तसेच शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन अश्रू वाहत आहे. नुकसान झालेल्या संपूर्ण शेतकरी बांधवाच्या डोळ्यात अश्रु धारा वाहत असतानचे विदारक चीत्र सद्यस्थितीला प्रकर्षांने दिसुन येत आहे. ज्या प्रमाने आई वडील आपल्या मुलाचे पालनपोषण करतात त्याच प्रमाणे शेतकरी भर उन्हात, पावसात राबराब राबून, शेतीची मशागत करतात. परंतू हातात आलेल्या पिकाची अशी दुर्दशा पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्यागत झाली असुन पुढे करायचे काय, खायचे काय, धानाची कापणी करायची कशी असे यक्षप्रश्न पुन्हा बळीराजाला सतावत आहेत.
यावर्षीच्या हंगामात सुरुवातीला पावसाचा लपंडाव त्यानंतर आलेली अतिवृष्टी आणि रोगांच्या साथी, किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांची शेती आधिच बाधीत झाली असतांना परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान केले आहे. उधारवाडी व कर्ज काडून फुलवलेली शेती डोळ्यासमोर उध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे निसर्गाचा प्रकोप अशा चक्रव्युहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या मात्र संपता संपत नाही. संपूर्ण शेतीतील पीके ही डौलाने उभी होती. त्यामुळे यावर्षी तरी संपूर्ण कर्ज फेडून आपण मोकळे होऊ अशी स्वप्ने उराशी बाळगुन असणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाने दगा दिला आहे. शेतीची ही बिकट अवस्था पाहून परीसरातील शेतकरी बांधवाकडुन शासनाकडे मदतीची मागणी केली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी शेतीवर जाऊन मोका चौकशी व पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.



