विज कर्मचाऱ्यांचा सन्मान कधी होणार? – लेखक -सतीश येनभूरे
. लेखक :- सतीश येनभूरे – ७०८३१४४८८५
विषय :- विज कर्मचाऱ्यांचा सन्मान कधी होणार?
वणी – नहेमी विजेच्या गजबजाटात वावरणाऱ्या मुंबईत विज गायब झाली आणि गदारोळ माजला.विज गायब कशी झाली?जबाबदार कोण?विज कर्मचारी तर बिनकामाचे.ते काय काम करतात?एकही कर्मचारी धडाचा नाही. सगळे उद्धट म्हणून आपण लाखोली वाहून मोकळे झालो.पण महावितरणचे कर्मचारी आज महाराष्ट्रात विजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाकडे आपण नकळतपणे दुर्लक्षच करत आलो आहोत.आताही तेच करत आहोत.
देशात सध्या संकटांची राळच चालू आहे.एक संकट संपत नाही तोवर दुसरे संकट ‘आ’ वासून उभे राहत आहे. महाराष्ट्रात यापेक्षा भिन्न परिस्थिती नाही. आपण महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेऊ.कोरोना संकट मार्च पासून देशासह राज्यावर घोंगावते आहे. मग निसर्ग चक्री वादळाने धडक दिली. मग पावसाळ्यात धोधो कोसळणारा पाऊस,विजा,वादळ येऊन धडकले.ते जात नाही तोवर महाराष्ट्रात परतीच्या पावसाने अन् पुराने धुमाकूळ घातला. या अशा प्रसंगात जनसामान्यांच्या कोणता जीवाळ्याचा प्रश्न असेल तर तो म्हणजे वीज.
कोरोना संकट काळात लॉकडाऊन झाले. सगळे कर्मचारी घरी बसून वर्क फ्रॉम होम करत होते. पण महावितरणचे कर्मचारी मात्र प्रत्यक्ष फिल्डवर काम करत होते. लोकांच्या विजेच्या संदर्भातील समस्या सोडवण्याचे काम करत होते. विजपुरवठा अखंड पुरवण्यासाठी झटत होते . लोकांच्या संपर्कात येत होते. पण जसा गौरव डॉक्टर, आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांचा ‘कोरोना योद्धे’ म्हणून झाला तसा दिवसारात्र सेवा देणाऱ्या विजकर्मचाऱ्यांना कोणी ‘कोरोना योद्धा’ म्हणल्याचे स्मरत नाही.
कोकणात निसर्ग चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. पुर्ण विज पुरवठा करणारी संयत्रणा कोलमडून पडली होती.पण विजकर्मचाऱ्यांनी ज्या तन्मयतेने ते काम सुरळीत केले,लोकांच्या घरातील अंधार दुर केला त्या कर्मचाऱ्यांचा सन्मान आजतागायत कोणी केल्याचे स्मरत नाही.
पावसाळ्यात आणि आता परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. पुराने गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला आहे.विजव्यवस्था तर कधीच कोलमडून पडली होती. पण विज कर्मचाऱ्यांनी हार न मानता विजपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत केली. व प्रत्येकाच्या घरात प्रकाश तेवत ठेवला.
कित्येकदा विजेची कामे करत असताना दुर्दैवी घटना घडत असतात. कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. पण व्हिडीओ पाहून ( तो ही सोशल मीडियावर आलेला) फक्त हळहळ व्यक्त करण्याखेरीज आपण काय करतो?मग या कर्मचाऱ्यांचा गौरव ,सन्मान का होऊ नये?
विजबीले कळीचा मुद्दा-विज वितरण कंपण्या अव्वाच्या सव्वा बिले आकारत असतात.त्यात कर्मचाऱ्यांचा कितपत सहभाग असतो हे संशयास्पद आहे. पण त्या बिले आकारण्यावरुन ग्राहकाच्या रोषाला मात्र कर्मचाऱ्यांना जावे लागते. या बिलांमुळे लोकांचा कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.पण कर्मचाऱ्यांना समजून कोणी घेत नाही. त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा-कुठल्याही क्षेत्रातील कर्मचारी असे उद्धटपणे वागतात. पण त्याचे प्रमाण नगण्य अथवा अपवादात्मक असते. म्हणून त्यांच्या अशा वागण्याचा परिणाम प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर होऊ नये .
अशा संकटसमयी जीवतोड मेहनत करून लोकांच्या घरात अंधार सारून प्रकाश पोहचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान व्हावा .एवढीच माफक अपेक्षा.
लेखक :-
सतीश यानभुरे,
७०८३१४४८८५
८६०५४५२२७२
१८ /१०/२०२०



