मृतकाचे नातेवाईकांनाच उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात – शिरपूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वणी :- कायर नवरगाव येथील शेतशिवारात विजेच्या प्रवाहाने विलास मोहूर्ले या सालगडीचा मृत्यू झाला. याबाबत त्याचा मुलगा ईश्वर मोहूर्ले यांनी शेतमालकविरोधात तक्रार द्यायला पंचायत समिती सभापतीसह नातेवाईकांसोबत शिरपूर पोलीस स्टेशनला गेले असता त्यांनाच आरोपीसारखी वागणूक देण्याचा प्रकार घडला.
वणी तालुक्यातील नवरगाव शेतशिवारात प्रभाकर भोयर यांचे डेअरी फार्म व शेती असून या ठिकाणी विलास गणपत मोहूर्ले हा 10 वर्षांपासून सालगडी म्हणून काम करीत होता. 2 वर्षांपूर्वी पत्नी मरण पावली होती तेव्हापासून ईश्वर मोहूर्ले वय 22 वर्ष याला घेऊन राहत होता. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 12 चे दरम्यान कायर येथे दुकानात काम करीत असलेल्या ईश्वर या मुलाला मालकाने घ्यायला पाठवले. मुलगा आला त्यावेळी वडीलाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. गावाकडील नातेवाईकास माहिती न देता पोलीस तक्रार व शवविच्छेदन करून प्रेत गावाकडे मालकाने पोहचविले.
आज मुलगा ईश्वर मोहूर्ले, सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार, काका विकास मोहूर्ले, मारोती कंकलवार, नितेश येनुगवार यांचेसह घटनास्थळी पाहणीकरिता गेले. पाहणीत पिकाचे संरक्षणासाठी लावलेल्या बॅटरीचलीत तारेवर पोलवरील तार तुटल्याने करंट लागून मृत्यू झाल्याचे दिसले. मात्र मालकाच्या दुर्लक्षितपणामुळे तार तुटले त्यामुळे मालकाचे विरुद्ध तक्रार देण्यास मृतकाचा मुलगा व सोबती गेले असता तेथील ठाणेदार राऊत यांनी काहीही माहिती न घेता इथे कशाला आले असे प्रश्न विचारीत पोलीस सहकाऱ्यांस बाहेर जिल्ह्यातून आल्यामुळे सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले परंतु सभापती विजय कोरेवार यांनी ई पास दाखविल्यानंतर इतरांना पोलीस स्टेशनचे बाहेर ठेऊन मृतकाच्या मुलाची तक्रार घेतली. तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका लोकप्रतिनिधी सभापती व नातेवाईकाला आरोपिसारखे वागणूक दिल्या गेली. तक्रारदाराला न मागता प्रथम खबरी अहवाल प्रत द्यायला पाहिजे पण ती प्रतसुद्धा तक्रारदार मुलास 5 दिवसानंतरही देण्यात आली नसल्याने शिरपूर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
प्रभाकर भोयर यांचे शेतात कामावर असताना मृत्यू झाला ही मालकाची जबाबदारी नाही का? केलेल्या कामाचा हिशेब करून उर्वरित रक्कमही देण्यास मालक का टाळाटाळ करीत आहे? 10 वर्ष सेवा दिल्यानंतर मुले अनाथ झाल्यावर त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार मालकाने का करू नये? असे प्रश्न निर्माण होत आहेत.



