पाथरी सुंदर माझं गाव केल स्थानीक राजकारण्यांनी भकास …..
पाथरी सुंदर माझं गाव
केल स्थानीक राजकारण्यांनी भकास …..
सावली ( लोकमत दुधे )
महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी नगरी ची विशिष्ट ओळख आहे. पाथरी नगरीची ओळख कुणाची गुलाम नाही. पाथरी नगरी आत्तापर्यंत तीन तालुक्यात समाविष्ट झालेली असून राजकीय कुटील डावामुळे सध्या सावली तालुक्यात समाविष्ट केलेली आहे. पाथरी नगरीला तालुका करा अशी मागणी अनेक दिवसापासून वारंवार होत असून आजही ही मागणी धूळखात आहे.इंग्रज राजवटीच्या काळात पाथरी नगरी या परिसरातील केंद्र बिंदू होते. परिसरातील घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी इंग्रजांनी पाथरी नगरी मध्ये अनेक कार्यालये उघडून परिसरात लक्ष केंद्रित करायचे. परिसरातील राजकीय घडामोडी सुद्धा याच ठिकाणातून होत असत. पण राजकीय नेत्यांच्या आशिर्वादामुळे ही नगरी दिवसेंदिवस मागे होत चालली आहे
इंग्रजांनी पाथरीला परिसरातील केंद्रबिंदू ठरवून या ठिकाणी पोलीस स्टेशनची निर्मिती केली. आजही पोलीस स्टेशनची वास्तू इंग्रजांनी बांधलेल्या भिंतीवर उभी आहे. अधिकारी निवासस्थान सुद्धा इंग्रज बनावटीचे आहे. या पोलीस स्टेशनं हद्दीत व्याहाड चौकी, गेवरा चौकी होती, पाथरी पोलीस स्टेशनं हद्दीत पाथरी ते मुडझा, पाथरी ते घोट परिसर, पाथरी ते व्याहाड लोंढोली साखरी असा मोठा परिसर होता. या ठिकाणी जवळपास 65ते 70 कर्मचारी कर्तव्यावर असायचे. पण पाथरी नगरीला डावलून तालुक्याचे विभाजन झाले आणि या पोलीस स्टेशनची सीमा कमी करून आता फक्त 34 ते 35 कर्मचारी कर्तव्यावर आहेत.
केंद्रबिंदू असलेल्या नगरी मध्ये इंग्रजांनी पोस्ट कार्यालय उघडले त्याचा फायदा परिसरातील जनतेला व्हायचा, अनेक बिनतारी संदेश या कार्यालयातून पोस्ट कार्ड च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम होत असायचे इंग्रजी राजवटीचा कारभार, व संदेश सुद्धा याच कार्यालयातून होत असायचा. इंग्रजांनी दूरदृष्टीकोन ठेवून आपला कार्यभार चालविण्यासाठी या नगरीला परिसरातील केंद्रबिंदू बनवले. या नगरीमध्ये शिक्षणाची सोय म्हणून जिल्हा परिषद विभागाची प्राथमिक शाळा आहे या शाळेत जवळपास 17 कर्मचारी यांची नियुक्ती आहे. एक जिल्हा परिषद विभागाची माध्यमिक शाळा आहे. या माध्यमिक शाळेत जवळपास 10 कर्मचारी यांची नियुक्ती आहे. आधीच्या काळात सर्व शिक्षक मुख्यालयी राहत असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा काही औरच होता. परंतु आजची परिस्थिती बघता एकही कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसल्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. काही वर्षा अगोदरच परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीकरिता खाजगी महाविद्यालय सुद्धा सुरु करण्यात आले.प्राथमिक इंग्रजी शिक्षण मिळण्यासाठी बाहेरील खाजगी संस्थेने कान्वेंट सुद्धा सुरु केले. या नगरीमध्ये आरोग्याच्या सोयीकरिता एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जुने आरोग्य केंद्र परिसराच्या दृष्टीने लहान पडत असल्यामुळे आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळण्यासाठी मोठी इमारत उभी करण्यात आली. लहान इमारत असून सुद्धा कर्मचारी यांचा अभाव कधीच पडला नाही. सर्व कर्मचारी मुख्यालयी राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडायचे. घराघरात जाऊन आरोग्याची तपासणी करायचे दिवसरात्र सेवा द्यायचे. साधारण रुग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाहेर पाठवल्या जात नसायचा.त्या रुग्णाचा उपचार मनोभावे याच आरोग्य केंद्रात करून रुग्ण बरा व्हायचा पण आज परिस्थिती वेगळी आहे. मोठी इमारत उभी झाली परंतु कर्मचारी अभाव तसेच मुख्यालयी हजर राहत नसल्याने आरोग्याच्या सुविधा सुद्धा जनतेला व्यवस्थित मिळत नसल्याचे चित्र अनुभवायला मिळत आहे. आधीच्या काळात दळणवळणाची उत्तम सुविधा नव्हती प्रत्येक कर्मचारी यांच्याकडे स्वतःच्या गाडीची सोय नसल्याने जवळपास प्रत्येक विभागाचे कर्मचारी मुख्यालयी हजर असायचे आणि तशी सक्ती सुद्धा शासनाकडून केल्या जायची परंतु वाढत्या वेतनामुळे आणि सक्तीचे नियम नसल्यामुळे आज एकही कर्मचारी मुख्यालयी राहत असताना दिसत नाही. पाथरी नगरी नक्षलग्रस्त भागात मोडल्या जाते त्याचा फायदा कर्मचारी घेत असून घरभाडे भत्ता, नक्षल भत्ता शासन देत असून सुद्धा मुख्यालयी हजर राहत नसल्याने आधीच्या काळातील सेवेत आणि आत्ताच्या काळातील सेवेत खूप मोठी तफावत आहे.
या नगरीमध्ये कोसा उत्पादन करण्याचे जिल्ह्याचे कार्यालय. आहे. या केंद्रात कोस्याच्या धाग्याची निर्मिती होते या कोसा उत्पादन केंद्रात 30 ते 40 महिला व पुरुष काम करीत असून या केंद्रातून 30 ते 40 कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. या कोसा उत्पादन केंद्रामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकरी वर्गाला याचा लाभ मिळत आहे.
पाथरी नगरीमध्ये परिसरातील सिंचनाच्या सोयीकरिता इंग्रजांनी 1917 मध्ये मोठे जलाशय असलेल्या आसोला मेंढा तलावाची निर्मिती केली. आज शतक पूर्ण होऊन सुद्धा हा तलाव विकासापासून वंचितच आहे. अनेक दिवसापासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाची, पर्यटन स्थळाची मागणी पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने धूळखात आहे. हे तलाव, निसर्ग सौंदर्याने नटलेले असताना सुद्धा या कडे स्थानिक प्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. या ठिकाणी मुख्य व्यवसाय शेती असून शेतीकरिता सिंचनाची सोय म्हणून आसोला मेंढा तलावाची निर्मिती इंग्रजांनी केली. आसोला मेंढा तलाव मोठे जलाशय असून सम्पूर्ण महाराष्ट्रात या तलावाची ओळख आहे. सिंचनाच्या तक्रारी संदर्भात किव्हा शेतीच्या तक्रारी किव्हा कामाच्या संदर्भात या नगरीमध्ये परिसरातील मुख्य ठिकाण म्हणून तलाठी कार्यालय, कृषी विभाग, मंडळ विभाग अशी कार्यालये उघडण्यात आली. परंतु राजकीय पुढाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे या कार्यालयात कर्मचारी केव्हा, केव्हाच बघायला मिळतात. मुख्य म्हणजे सिंचनाचे समस्येकरिता इंग्रजांनी या नगरीमध्ये सिंचाई विभाग शाखा अभियंता कार्यालय निर्माण केले. पण कुणास ठाऊक कि गावातील प्रतिनिधींचे लक्ष नसल्यामुळे हे कार्यालय सुद्धा स्थलांतरित करण्यात आले. या मुळे शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसला असून जवळचे कार्यालय दूर गेल्याने समस्या मांडण्याकरिता पायपीट करावी लागत आहे.
या पाथरी नगरीत जंगल सुरक्षा करण्यासाठी वनविभाग कार्यालय, एफ, डी. सी. एम कार्यालय आहेत या कार्यालयात सुद्धा आधीच्या काळात कर्मचारी यांचा अभाव नसायचा. या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील जनतेला रोजगाराची संधी उपलब्ध असायची. वृक्षलागवड तथा वृक्षाचे संगोपन करण्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हायचा. .ती रोजगाराची संधी आज जनतेला मिळत नसल्याने रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पाथरी नगरीत असलेल्या सर्वच कार्यालयातील कर्मचारी जर मुख्यालयी राहिले तर अनेक समस्यांचे निवारण होऊन परिसरातील जनतेला आर्थिक फायदा सुद्धा होऊ शकतो.
एकंदरीत पाथरी नगरी ही परिसरातील मुख्य ठिकाण असून परिसराचे केंद्र बिंदू आहे. जनतेला आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, जयकिसान बँक, विदयुत विभागाचे 33 kv केंद्र विदयुत विभागाचे कार्यालय , तथा ग्राम सचिवालयाची भव्य इमारत, इमारती मध्ये तालुक्याच्या दर्जाचे सर्व कार्यालय असताना सुद्धा आणि पाथरी नगरीत सर्वच कार्यालय, तसेच आजपावेतो या पाथरी नगरीत स्थानिक तीन पंचायत समिती सदस्य, व दोन जिल्हा परिषद सदस्य झाले असताना सुद्धा राजकीय पुढाऱ्यांच्या स्वार्थी हेतूमुळे, दुर्लक्षित पणामुळे पाथरी नगरी तथा परिसर विकासापासून वंचितच राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील जनतेच्या माध्यमातून पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीच्या वतीने, अनेक पुढार्यांना निवेदन देऊन अनेकदा मोर्चे बाजारपेठ बंद ठेवून, मंत्रालयात मागणी करून सुद्धा या नगरीकडे हेतुपुरस्पर तालुका करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असून पाथरी नगरीला डावलले जात आहे.



