९ आगस्ट क्रांतिदिनी” मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने वणी व पाटणबोरी येथे निदर्शने आंदोलन
वणी : भाजप च्या मोदी केंद्र सरकार कडून लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणावर लोकशाहीला नाकारून संविधान विरोधी, जनविरोधी निर्णय, धोरणे व कायदे केल्या जात असल्यामुळे देशातील कष्ट करणारी जनता,शेतकरी,शेतमजूर, कामगार, छोटे व्यवसाय करणारा देशोधडीला जात आहे. देशात कधी नव्हती एवढी बेरोजगारी वाढली असताना कोरोनाच्या नावाखाली संसदेला, विरोधी पक्षांना किंवा जनतेला विश्वासात न घेता जनतेला संघर्षातून मिळवून घेतलेले अधिकार संपुष्टात आणल्या जात आहे. या करिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या संयुक्त विद्यमाने ९ आगस्ट क्रांतिदिनी वणी व पाटणबोरी येथे मोदी सरकारला होश मध्ये आणण्यासाठी खालील मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करा, राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज ताबडतोब द्या,घरगुती व कृषिपंपाची वीज बिल माफ करा, २०२० चे वीज विधेयक रद्द करा,युरिया ची कृत्रिम टंचाई दूर करून शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्या, प्रत्येक पिकाला उत्पादन खर्च अधिक ५०% नफा हमीभाव जाहीर करा व हमीभावा पेक्षा कमी दरात खरेदी करणार्यांवर गुन्हे दाखल करा, पेट्रोल, डिझेल व गॅस चे भाव निम्म्याने कमी करा, लाभार्थ्यांमध्ये वर्गवारी न करता प्रत्येक कुटूंबाला दरमहा 20 किलो धान्य, १ ली तेल, १ की डाळ, १ की साखर देण्यात यावे, केंद्र सरकारच्या मोफत धान्य वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा, महसूल, देवस्थान व वनविभागाच्या जमीन वरील अतिक्रमण धारकांना जमीनी वरून हटविणे व त्रास देने बंद करा, लॉकडाउन काळात प्रत्येक कुटुंबाला दरमहा ७५०० ₹ आर्थिक मदत द्या, आदिवासी जनतेला मिळणारी खावटी ताबडतोब द्या, केंद्र सरकारने घेतलेले नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा व ऑनलाइन शिक्षण पद्ध्ती रद्द करा आदि मागण्या ह्या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.
ह्या आंदोलनात जास्तीतजास्त जनतेने सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी करण्याचे आवाहन कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, चंद्रशेखर सिडाम, खुशालराव सोयाम, किसन मोहूर्ले, मनोज काळे,विप्लव तेलतुंबडे, कवडू चांदेकर, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, संजय कोडापे, अशोक येल्लावार, अशोक गेडाम, ऋषी कुळमेथे आदींनी केली आहे.



