थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापल्यास संबंधित अधिकाऱयावर कारवाई-ऊर्जामंत्री डॉ. नीतीन राऊत
थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापल्यास संबंधित अधिकाऱयावर कारवाई
भाजप ने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करावे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
कोरोना महामारीमुळे सध्या सर्वांना आर्थिक चणचण जाणवत आहे. त्यामुळे या संकटकाळात एखाद्या घरगुती वीज ग्राहकाचे वीज बिल थकीत असल्याचे कारण देत महावितरणने कनेक्शन कापल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱयाकर कारवाई केली जाईल असा इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.
या दरम्यान वीज बिलात कोणतीही गडबड नसेल तर ग्राहकांनी तत्काळ आपले बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असेही आवाहन केले आहे.राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे एकत्रित वीज बिल जूनमध्ये पाठवले आहे.
त्यामुळे वाढीव बिलाचे कारण देत ग्राहक बिल भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांच्या शंकेचे निरसन होइपर्यंत त्याचे वीज कनेक्शन कापू नये असे निर्देश महावितरणला याआधीच दिले आहेत. तरीही एखाद्या ग्राहकाचे कनेक्शन कापले तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱयावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. तसेच सामान्य ग्राहकांप्रमाणे महावितरणही वीज निर्मिती कंपन्यांची ग्राहक आहे, त्यामुळे त्यांनाही पैसे द्यावे लागत असल्याने ग्राहकांनी बिल भरून सहकार्य करावे असे उर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे
ग्राहकांना वाढीव बिल आल्याचे सांगत भाजप ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. त्याबाबत बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की भाजपने महावितरणविरोधात नव्हे तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करावे. केंद्राने वीज वितरण कंपन्यांसाठी 90 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यापैकी दहा हजार कोटी रुपये महाराष्ट्राला द्यावे अशी मागणी केंद्राकडे केली होती. मात्र ते न मिळाल्याने ग्राहकांना वीज बिलात सवलत देता आली नाही. त्यामुळे भाजपने केंद्राविरोधात आंदोलन करावे असा सल्ला उर्जामंत्र्यांनी दिला आहे.



