वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
*सावली तालुक्यातील खळबळ जनक घटना*
*किती जणांचा बळी गेल्यावर उपाययोजना करणार ?*
*वनमंत्री साहेब आता तरी लक्ष दया…!*
प्रतिनिधी : प्रा.शेखर प्यारमवार
सावली पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चकवीरखल येथील मंदा एकनाथ सिडाम वय ५३वर्ष ही रात्रोच्या सुमारास घराच्या अंगणात खाटेवर झोपली असताना नरभक्षक वाघाने रात्री १ ते २ च्या सुमारास खाटेवरून उचलून नेवुन नरडीचा घोट घेतल्याने महीलेचा मृत झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून गावात राहायचं की जंगलात असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सावली वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील क्षेत्र असून या परिसरात वाघ व बिबट यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जनमानसात वनविभागाबाबत प्रचंड आक्रोश निर्माण होत आहे. आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एकूण ५३ जणांचा बळी गेला असुन एकट्या सावली तालुक्यात हा २० वा बळी आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता एक तृतीयांश पेक्षा जास्त बळी एका सावली तालुक्यात गेलेले आहेत, ही गांभीर्याची बाब आहे मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मागील आठवड्यात बोरमाळा येथील पाच वर्षीय हर्षल चा वाघाने बळी घेतलेला होता.

वाघाच्या हल्ल्यात वाघाने किती बळी घेतल्यानंतर शासन व प्रशासन उपायोजना करणार ? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आमदार, खासदार आणि मंञ्यानी मृतक आणि जखमींच्या घरापर्यंत जाण्यापेक्षा वाघाच्या हल्ल्यात बळी जाऊच नयेत यासाठी काही ठोस उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. सांत्वन पर भेट देऊन समस्या मिटणार नाहीत किंवा मृत कुटुंबीयांना २० लाख रुपयाचा धनादेश देऊन त्यांच्या कुटुंबावर येणारा दुःख मिटणार नाही कारण मानव जीवन हा प्रत्येकालाच एकदाच मिळतो.
मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता आणि जनतेचा वनविभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सावली वन परिक्षेत्रात अनेक साहित्याचा अभाव आहे त्याची पूर्तता करण्यात यावी यासाठी सावली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांना नुकतेच निवेदन सादर केलेले आहे, परंतु याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त असून वाघाच्या हल्ल्यात बळींची संख्या सुद्धा जास्त आहे. ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत ज्यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहेत.वनमंत्री साहेबांनी आता तरी लक्ष द्यावे नाही तर येणाऱ्या दिवसात शासनाच्या विरोधात वाघाच्या बंदोबस्तासाठी नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येणार का? म्हणून वनमंत्री साहेब आता तरी लक्ष दया….. अशी मागणी नागरीक करीत आहेत



