ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले
ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले
प्रतिनिधी :-
येत्या १८ डिसेंबर २०२२रोजी होऊ घातलेल्या बोथली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. बोथली ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात कधी नव्हे प्रथमच सरपंच पदाकरिता ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून २८ उमेदवार सदस्य पदाकरिता भाग्य आजमावत आहेत.
प्रत्येक पॅनलचे उमेदवार चिन्हांकित मतपत्रिका घेऊन ‘डोअर टू डोअर’ प्रचाराला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षाचे चिन्ह नसले तरी भाजपा, कॉंग्रेस व इतर पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करतांना दिसत आहेत. तन- मन धनाने काही कार्यकर्ते उमेदवारांच्या पाठीशी फिरतांना दिसत आहेत.
सरपंचाची निवड थेट जनतेतून असून सर्वसाधारण प्रवर्गातून आरक्षण असल्याने हिवाळ्यात थंडी वाढत असतांना गावातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापत आहे. ९ सदस्य असलेल्या बोथली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाची निवडणूक आधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावाच्या सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



