संध्याकाळची वेळ, ताळोबा जंगल परिसर आणि नादुरुस्त बस मध्ये घाबरलेले 50 विद्यार्थी
ताडोबा जंगल परिसरात एस टी महामंडळाची एक बस संध्याकाळी 6:00 च्या सुमारास बंद पडली होती. ह्या बस मधे जवळपास 40 ते 50 शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनी आपल्या घरी जाण्याकरिता निघाले होते मात्र बस नादुरुस्त झाल्याने हे विद्यार्थी ताडोबाच्या जंगलात अडकुन पडले होते. ताडोबा जंगल परिसर वाघांसाठी जगप्रसिध्द आहे व त्या परिसरात अंधार पडल्यानंतर नागरिकांना बाहेर निघणे धोकादायक असते. अशा परिस्थितीत बस नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात चलबिचल सुरू होती.
नेमक्या याच वेळी दुर्गापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार स्वप्निल धुळे अडेगाव येथिल जिल्हा परिषद शाळेतील ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्राला भेट देऊन दुर्गापूर येथे परत जात असताना त्यांना आगरझरी – अडेगाव दरम्यान चंद्रपूर येथुन देवाडा येथे जाणारी MH 34 N 8916 क्रमांकाची एस टी महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला दिसली त्या बस मधे काही प्रवाशी व जवळपास 50 विद्यार्थी होते. बस जंगलात अशी उभी असण्याचे कारण बस चालकाला विचारले असता त्याने ऑईल लीक झाल्या मुळे बस बंद पडली असल्याचे सांगितले.
संध्याकाळची वेळ, जंगल परिसर आणि नादुरुस्त बस मधे भेदरलेल्या अवस्थेतील जवळपास 50 विद्यार्थी एका चित्रपटाला शोभेल अशी परिस्थिती. चंद्रपूर आगारातून दुसरी बस केव्हा येईल ह्याची कुठलीही शाश्वती नसल्याने अखेर ठाणेदार स्वप्निल धुळे ह्यांनी आपली कार्यतत्परता दाखवुन त्या सर्व विद्यार्थ्यांना घरी पोचते करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवून आपल्या ठाण्याचे शासकीय वाहन तसेच आगरझरी येथिल सफारी वाहन चालकांना विनंती करून त्या विद्यार्थ्यांना आडेगाव व देवाडा येथे पोहोचविण्याबाबत विनंती केली. ठाणेदारांनी दाखवलेली कळकळ त्या वाहन चालकांनी ओळखुन सहकार्य करण्याचे मान्य केले व सुरू झाला विद्यार्थ्यांचा घराकडचा प्रवास. तिकडे विद्यार्थी वेळेत घरी न आल्याने चिंताक्रांत असलेल्या पालकांना घटनाक्रम कळताच त्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला व सफारी वाहन चालक तसेच ठाणेदार स्वप्निल धुळे ह्यांनी दाखवलेली तडफदारी ह्याचे कौतुक करून आभार मानले.



