Vidarbh24News

Latest Online Breaking News

Rajiv Gandhi | आज राजीव गांधी यांची पुण्यतिथी, पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले ‘हे’ निर्णय नेहमी लक्षात राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देऊन, भारताला आधुनिक जगाची कवाडं उघडून देणाऱ्या माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी  (Rajiv Gandhi) यांची आज पुण्यतिथी आहे. 20 ऑगस्ट 1944 रोजी राजीव गांधी यांचा जन्म झाला. सुरुवातीला राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिलेले राजीव गांधी. पुढे संजय गांधींच्या अपघाती निधनानंतर राजकारणात प्रवेश केला. पुढे ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधानही झाले. 21 मे 1991 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान चेन्नईजवळ लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या केली. भारताला संगणकयुगात आणण्यासाठी धडपणारा हा तरुण नेता भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन गेला..

राजीव गांधी यांनी घेतलेले हे निर्णय आपण कधीच विसरु शकणार नाही

1- मतदान करण्याची वयमर्यादा कमी केली

देशात आधी मतदान करण्यासाठी 21 वर्ष वयाची अट होती. ही अट युवा पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मते चुकीची होती. त्यांनी 18 वर्ष पूर्ण युवकांना मताधिकार दिला. 1989 मध्ये 61 वी घटनादुरुस्ती करत मतदान करण्याची अट 21 वरुन 18 वर्ष केली. म्हणूनच आता 18 वर्षाचे युवक आपला प्रतिनिधी निवडू शकतात.

2-कंप्यूटर क्रांती

आज भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी काही पावलं उचलत आहे. त्याचा पाया राजीव गांधी यांनी रचला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राजीव गांधींना भारतात कंप्यूटर क्रांती आणण्याचं श्रेय दिलं जातं. त्यांचं म्हणणं होतं की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय उद्योगांचा विकास शक्य नाही. भारतातील लोकांपर्यंत त्यांनी केवळ कंप्यूटरच पोहोचवले नाहीत तर इम्फॉर्मेशन टेक्नोलॉजीला पुढं घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका बजावली.

3- पंचायतीराज व्यवस्थेचा पाया

पंचायतीराज व्यवस्थेचा पाया रचण्याचं श्रेय देखील त्यांनाच जातं. राजीव गांधी यांचं म्हणणं होतं की, जोपर्यंत पंचायती राज व्यवस्था मजबूत होत नाही, तोवर अंतिम घटकांपर्यंत लोकशाही पोहचू शकत नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळात पंचायतीराज व्यवस्थेबाबत एक संपूर्ण प्रस्ताव तयार केला. 21 मे 1991 ला त्यांची हत्या झाल्यानंतर एका वर्षाने त्यांचा हा विचार प्रत्यक्षात उतरला. 1992 मध्ये 73 आणि 74 वी घटनादुरुस्ती करत पंचायतीराज व्यवस्थेचा उदय झाला. राजीव गांधींच्या सरकारने केलेल्या 64 व्या घटनादुरुस्तीच्या आधारे नरसिम्हा राव सरकारकडून हे विधेयक पारीत करण्यात आलं. 24 एप्रिल 1993 पासून संपूर्ण देशात पंचायती राज व्यवस्था लागू झाली.

4-नवोदय विद्यालय
ग्रामीण आणि शहरी भागात नवोदय विद्यालयांचा पाया देखील राजीव गांधींनीच रचला. त्यांच्या कार्यकाळात जवाहर नवोदय विद्यालयं सुरु झाली. ही आवासी विद्यालय आहेत. प्रवेश परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना या विद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांना 6 वी ते 12वीपर्यंत मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा मिळते.

5-NPE ची घोषणा
NPE ची घोषणा देखील राजीव गांधी यांनीच केली. राजीव गांधी सरकारने 1986 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण(NPE) ची घोषणा केली. या धोरणांतर्गत पूर्ण देशात उच्च शिक्षण व्यवस्थेचं आधुनिकीकरण आणि विस्तार झाला.

6-दूरसंचार क्रांती
कम्प्यूटर क्रांतीसोबतच दूरसंचार क्रांती देशात आणण्याचं श्रेय देखील राजीव गांधी यांनाच जातं. राजीव गांधी यांच्या पुढाकाराने ऑगस्ट 1984 मध्ये  भारतीय दूरसंचार नेटवर्कची स्थापना करण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स(C-DOT) ची स्थापना झाली. या अंतर्गत शहरापासून गावांपर्यंत दूरसंचाराचं जाळं टाकण्याचं काम सुरु झालं. जागोजागी पीसीओ सुरु झाले. गावखेड्यातील जनता दूरसंचार क्रांतीमुळं शहरं आणि जगाशी जुळू शकली. त्यानंतर 1986 मध्ये राजीव गांधी यांनी एमटीएनएलची स्थापना केली.

राजीव गांधी यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे :

1. राजीव गांधी यांचा यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. राजीव गांधी यांचं नाव त्यांचे आजोबा म्हणजे पंडीत जवारहलाल नेहरु यांच्या पत्नीच्या नावावरुन ठेवण्यात आले. पंडीत नेहरुंच्या पत्नीचे नाव कमला नेहरु. कमला म्हणजे लक्ष्मी आणि ‘राजीव’ हे सुद्धा कमळाचे दुसरे नाव. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या या पहिल्या मुलाचे नाव ‘राजीव’ ठेवण्यात आले.

2. राजीव गांधी हे ‘फ्लाईंग क्लब’चे सदस्य होते. त्यांनी तेथे सिव्हिल एव्हिएशनचं प्रशिक्षण घेतलं. 1970 साली एअर इंडियामध्ये कामाला सुरुवात करणाऱ्या राजीव गांधी यांनी 1980 साली राजकारणात प्रवेश केला.

3. राजीव गांधी यांना कॉम्प्युटर, गॅजेट्स यांमध्ये अधिक रस होता. पंतप्रधान म्हणूनही त्यांनी देशात तंत्रज्ञानासंबंधी विकासात पुढाकार घेतला. तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला ताकदवान बनवण्याचं त्यांनी कायम स्वप्न बाळगलं आणि ते पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णयही घेतले. भारताला संगणकयुगात आणणारा पंतप्रधान म्हणूनही त्यांची ओळख आहे.

4. 1981 साली राजीव गांधी यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.

5. राजीव गांधी हे भारताचे आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

6. राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने 1984 साली ऐतिहासिक विजय मिळवला होता. लोकसभेच्या 542 जागांपैकी काँग्रेसला 411 जागा मिळाल्या होत्या.

7. बोफोर्स घोटाळा, भोपाळ दुर्घटनेतील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसनचं देशाबाहेर पलायन इत्यादी गोष्टींवरुन राजीव गांधी यांच्यावर आरोपही झाले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असणाऱ्या व्ही. पी. सिंग यांनी बोफोर्स प्रकरण बाहेर काढलं. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली. आधी मंत्रिमंडळातून बाहेर, मग काँग्रेसमधूनही त्यांना बाहेर काढण्यात आले.

8. डिजिटल क्रांतीसह राजीव गांधी यांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. 1986 साली राजीव गांधी यांनी ‘जवाहर नवोदय विद्यालय योजना’ ही महत्त्वपूर्ण योजना आणली. 6 वी ते 12 वी पर्यंत मोफत निवासी शिक्षणाची तरतूद या योजनेत होती. या योजनेची सर्वच स्तरातून स्तुती झाली होती.

9. 1988 साली राजीव गांधी यांनी लिट्टेविरोधात लढण्यासाठी श्रीलंकेच्या मदतीसाठी शांतीसैनिक पाठवले. त्याची परिणीती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली.

10.  21 मे 1991 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान चेन्नईजवळ लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत, राजीव गांधी यांची हत्या केली. त्यानंतर लिट्टेला भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. पुढे जगातील 32 देशांनी लिट्टेला दहशतावादी संघटना म्हणून घोषित केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
05:28