जेप्रा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; पथदिवे अनेक दिवसांपासून बंद, ग्रामस्थ त्रस्त
प्रतिनिधी | जेप्रा, गडचिरोली
जेप्रा गावातील अनेक पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने संपूर्ण गाव अंधाराच्या विळख्यात सापडले असून ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील प्रमुख रस्ते, चौक आणि वस्ती परिसरातील पथदिवे बंद असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्रीच्या वेळी कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून चोरीसह इतर अनुचित घटनांचा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गावातील सर्व बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करून रस्ते प्रकाशमान करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे.
गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे



