शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळेपर्यंत लढणार – ऍड.वामनराव चटप
*आशिष यमनुरवार/ विदर्भ 24 न्युज*
*शहर प्रतिनिधी, राजुरा.*
संपर्क – 88559 94001
राजुरा, दिनांक 12 जून –
* शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलन सुरु
* राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे प्रतिबंधीत जीएम बियाण्याची जाहीर लागवड
* शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळेपर्यंत लढणार – ऍड.वामनराव चटप .
शेतकरी संघटनेने घोषित केल्याप्रमाणे आज दिनांक 12 जून,रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजता राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे प्रतिबंधित असलेल्या सुधारित जनुक कापसाच्या बियाण्यांची जाहीरपणे पेरणी येथील शेतकरी बबन रणदिवे यांचे शेतात केली. यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी ” शरद जोशी जिंदाबाद ” व ” शेतकरी संघटनेचा विजय असो “,अशा घोषणा दिल्या.
या पेरणीच्या कायदेभंग आंदोलनात शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार ऍड.वामनराव चटप,कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती सभापती कवडु पाटील पोटे,माजी सभापती प्रभाकर ढवस व हरिदास बोरकुटे, शेषराव बोन्डे, दिलीप देठे, नानाजी पोटे,मारोती लोहे,कपिल ईद्दे ,मधुकर चिंचोलकर, आबाजी धानोरकर,नारायण आदे,मुरलीधर किन्नाके, विलास बोबडे,देविदास पडोळे, रामदास कोहपरे,बंडू डोंगे,रवींद्र बोबड, महिला आघाडीच्या सौ.वंदना सुरेश जुमनाके, सौ.माया दिलीप देठे,अनिता कोटनाके यांचेसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकर्यांना सर्व प्रकारचे उपलब्ध तंत्रज्ञान वापरण्याची मुभा असावी, जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करता यावी, पिकाचा उत्पादन खर्च कमी व्हावा,शेतकऱ्याचे व पर्यायाने देशाचे उत्पन्न वाढावे, ही शेतकरी संघटनेची जुनीच मागणी आहे. शेतकरी संघटनेने जीएम बियाणे वापरण्यावरील बंदी उठवावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी व पर्यावरण मंत्री महोदयांकडे मागणी केली. परंतु सरकार ही बंदी उठवायचा निर्णय घ्यायला तयार नाही. अखेर या मागणीसाठी यावर्षी पुन्हा प्रतिबंधीत बियाणे पेरुन सविनय कायदेभंग करण्याची घोषणा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी केली होती. यावर्षी शेतकरी संघटना हा खरिप हंगाम तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम म्हणून साजरा करीत असून प्रतिबंधित असलेल्या कापूस पेरणी करण्याचा निर्णय घेऊन त्याला आंदोलनाचे स्वरूप दिले.
प्रतिबंधीत बियाण्याची लागवड केली म्हणुन शेतकर्यांवर गुन्हे दाखल केल्यास शेतकरी तुरुंगात जायला तयार आहेत. शेतकऱ्यांना पिके घेतांना कमी खर्च यावा आणि आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी सुधारित जीएम बियाणे हे आंदोलन मैलाचा दगड ठरेल. राज्य सरकारने तातडीने कृषी विद्यापीठामार्फत जीएम बियाण्याची चाचणी सुरु करावी आणि केंद्र सरकारने या सुधारित बियाण्याला परवानगी द्यावी,अशी मागणी ऍड.वामनराव चटप यांनी यावेळी बोलतांना केली.



