“माझी वसुंधरा अभियानामध्ये सावली तालुका राज्यात अव्वल*
*ग्रामपंचायत चिखली प्रथम तर जिबगांव द्वितीय स्थानी*
पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत सावली तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत तब्बल १.५० कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. तर ग्रामपंचायत जिबगाव हिने द्वितीय क्रमांक मिळवत ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. यासोबतच सावली पंचायत समितीनेही विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले आहे.
निसर्गातील पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित जीवनशैली अंगीकारल्याशिवाय मानवजातीचे शाश्वत अस्तित्व शक्य नाही. जैवविविधतेचे संवर्धन व पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन च्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत दिनांक २ ऑक्टोबर २०२० पासून “माझी वसुंधरा” अभियान सुरू करण्यात आले आहे.
या अभियान 5.0 अंतर्गत मा. पुलकित सिंग (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर), मा. मिना साळुंखे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत) व मा. श्री. मुक्तेश्वर कोमलवार (गटविकास अधिकारी, सावली) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित विविध उपक्रम प्रभावीपणे राबवून स्पर्धेत विशेष स्थान मिळवण्यात यश आले.
या यशामध्ये मा. श्री. राजू परसावर (सहाय्यक गटविकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत), कार्यालयीन विभाग प्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, ग्राम रोजगार सेवक तसेच सी.आर.पी. यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांचा मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई येथे विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
लोकसहभाग, प्रभावी नियोजन आणि पर्यावरण संवर्धनाबाबतची दृढ बांधिलकी यामुळे सावली तालुक्यातील ग्रामपंचायत चिखलीने राज्यात अव्वल तर जिबगावने द्वितीय स्थान पटकावत पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.



